Sunday 17 February 2013

डुक्कराचे वाघाला आव्हान!

डुकरे ही नेहमीच घाणेरडी गणली जातात. पण पूर्वीच्या काळी ती तशी नव्हती. अरण्यांतल्या इतर प्राण्यांसारखी तीही स्वच्छ असत. ही डुकरे घाणेरडी कशी झाली त्याची एक मजेदार गोष्ट आहे. मेघालयातल्या अरण्यांत सगळी जनावरे खेळीमेळीने राहात होती. अरण्यांत सर्वांना पुरेसे खाद्य, गवत, इत्यादि भरपूर होते. एके दिवशी एक वाघ भक्ष्य शोधण्यासाठी निघाला.

त्याला पोटभर प्राणी खायला मिळाले. जिभल्या चाटत तो पाण्याच्या शोधांत निघाला. इकडेतिकडे हिंडल्यानंतर त्याला एक लहानसा तलाव दिसला. तो काठाजवळ पाणी पिण्यासाठी गेला. त्याच वेळी एक डुकराचे पिल्लू चिखलांत खूप वेळ खेळत होते. आणि समोरच्या बाजूला तेही पाण्यांत शिरुन पाणी पिऊ लागले. त्याने जेव्हा वाघाला पाहिले, तेव्हा ते भीतीने गारठले. त्याला पळून जाणे व बचाव करणे अगदी अशक्य होते.



इकडे वाघाला इतकी तहान लागली होती की ते पिल्लू त्याला दिसलेच नाही. वाघ पाणी प्यायला खाली वाकला, आणि सटकन मागे सरला. पाणी अतिशय गढूळ होते आणि त्याला घाणेरडा वास येत होता. त्या पिल्लाच्या अंगावरचा चिखल पाण्यांत मिसळला गेला होता. दुर्गंधी तर इतकी भयंकर होती की ते पाणी सोडून वाघ दुसरीकडे पाणी शोधायला निघाला.

वाघाची ही माघार पाहून ते पिल्लू प्रथम गोंधळून गेले. पण ते जरा धीट होते त्यामुळे त्याला वाटलं की वाघ आपल्यालाच घाबरला! नाहीतर तो इतक्या घाईने परत कशाला जाईल? त्या लहानग्या डुकराला आपण हत्तीसारखे बलवंत आहोत असं वाटलं. ते वाघामागे पळायला लागलं. त्याने वाघाला म्हटलं, ‘‘वाघोबादादा, परत येऊन माझ्याशी दोन हात करा. घाबरट कुठले. पळून जाऊ नका असे!’’




वाघ तहानलेला होता. त्याला काही आत्ता भांडायची इच्छा नव्हती. नुसती मान मागे वळवून तो गुरगुरला, ‘‘मी आज तुझ्याशी लढणार नाही. याच वेळेला तू उद्यां इथें ये आणि मग आपला सामना होईल.’’ पिल्लाची मात्र समजूत झाली की वाघ घाबरलाय म्हणून तो संधी शोधतोय! डुकराला आणखीनच चेव चढला व तो फुशारुन गेला.

धावतच घरी जाऊन त्याने घरीदारी सर्वांना जाहीर केले, ‘‘वाघोबा मला घाबरतो. तेव्हां आता मी यापुढे वनराज होणार!’’ घरांतल्या सर्व डुकरांना बोलावून त्याने जे घडलं ते सविस्तर सांगितलं. ते ऐकून थक्क झाले. वाघाने तलावांतलं पाणी का प्यायलं नसेल व तो तिथून का निघून गेला असेल, त्याचे कारण त्यांनी लगेच ओळखले. त्या पिल्लाला असा अगोचरपणा केल्याबद्दल सगळेच रागावले. वाघाला आव्हान देण्यांत आपण केवढी मोठी चूक केलीय ते डुकराला समजलं.

आता मात्र त्याची बोबडीच वळली. दुसर्‍या दिवशी वाघाच्या जेवणासाठी आपला बळी ठरलेलाच आहे असं त्याला वाटलं. नातवाची ही केविलवाणी अवस्था पाहून त्याचे म्हातारे आजोबा कासावीस झाले. छोट्या डुकराचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी एक योजना आखली. आणि त्यांनी त्या लहान डुकराला सांगितले, ‘‘तू कबूल केलं आहेस ना? मग ठरल्याप्रमाणे वाघाला भेट. नाहीतर तो इथे येऊन आम्हाला सगळ्यांना मारुन टाकील. पण त्याला भेटण्यापूर्वी तू चिखलांत भरपूर लोळ, म्हणजे तुझ्या अंगाला घाणेरडा वास येईल.’’


आजोबांनी सांगितल्याप्रमाणे ते छोटे डुक्कर घाणीत लोळले, आणि चिखल, हत्तीचे शेण, गुरांचा कचरा, वगैरे रानांतल्या गलिच्छ जागी ते यथेच्छ बागडले. अंगभर चिकटलेली ती घाण घेऊनच ते वाघाच्या भेटीला गेले. इकडे वाघ त्या पिल्लाची वाट बघतच होता. सामना संपला की त्या पिल्लावर ताव मारायचा हे त्याने आधीच ठरवलेले होते.

जेव्हां डुकराचे पिल्लू जवळ आले, तेव्हां त्या घाणीचा दर्प सहन न होऊन वाघ मागे सरला. ‘‘हे रे काय? तुझ्या अंगाला किती घाण वास मारतोय! शी शी शी !!!’’ ‘‘तू सांगितल्याप्रमाणे मी आलोय इथे. मी आपला माझ्या आजोबांनी शिकवलेले शेणगोळे फेकण्याचे काही प्रकार करुन पाहात होतो.’’ असं म्हणून डुकराचे पिल्लू किंचित पुढे आले.

वाघाला तो दुर्गंध सहन होईना. त्याला मळमळायला लागले. ‘‘चालता हो! माझ्याजवळदेखील येऊ नकोस!’’ तो संतापाने गुरगुरला. डुकराने नाराज झाल्याचे नाटक केले, व विचारले, ‘‘आणि आपल्या सामन्याचे काय?’’

‘‘गप्प बैस! मी नाही तुझ्याबरोबर लढणार,’’ वाघ मागे फिरत ओरडला. घाणीचा वास असह्य होत होता त्याला. डुकराचे पिल्लू मात्र आनंदाने उड्या मारत घरी गेले. त्याच्या कुटुंबियांना समजलं की घाणीनेच त्याला वाचवलं होतं. त्या दिवसापासून घराबाहेर पडले की सारी डुकरे प्रथम घाणीत लोळायला लागली. आजही ती तेच करतात.

Marathi Graffiti (नक्की वाचून पहा....)

पंचायुध

ब्रह्मदत्त काशी येथे राज्य करीत असता बोधिसत्वांनी युवराज म्हणून अवतार धारण केला. बारशाच्या दिवशी निरनिराळ्या देशातून थोर विद्वान व अनेक ज्योतिषी आले. ते राजाला म्हणाले - ''आपला हा मुलगा कोणी थोर महापुरुष दिसतो आहे! पंचायुधे धारण करून हा जगज्जेता होईल आणि शूर पराक्रमी म्हणून याचा नावलौकिक होईल!’’ म्हणून मुलाचे नाव पंचायुध असेच ठेवण्यात आले.


काही काळ लोटला. मुलाला समजूत येऊ लागली, तेव्हा राजाने त्याला गांधार देशाच्या तक्षशिला नगरीतील एका सुप्रसिद्ध गुरुकुलात विद्याभ्यासासाठी पाठविले.

पंचायुधने तक्षशिला येथील गुरुकुलात काही काळ अभ्यास केला व सर्व विद्यांमधे तो पारंगत झाला. गुरुकुलातून समावर्तन संस्कार झाल्यावर घरी निघतेवेळी कुलगुरुने शिष्याला आशीर्वाद देऊन पाच आयुधे दिली. गुरुवर्याचा निरोप घेऊन पंचायुध काशीला परत निघाला.

पंचायुधाला वाटेवर एक भयंकर अरण्य लागले. त्या अरण्यातून चालत असता पंचायुधाला वाटेत काही ऋषी व मुनी भेटले. ते म्हणाले - ‘‘बाबा रे, तुला पाहिले तर तू वयाने फारच लहान दिसतो आहेस! या रानात रोमांच नावाचा एक भयंकर राक्षस राहतो आहे. तू त्याच्या दृष्टीस पडलास तर तो तुला जिवंत सोडणार नाही. म्हणून तू या वाटेने न जाता दुसर्‍या वाटेने जा.’’

पराक्रमी पंचायुधाच्या मनावर मुनींच्या त्या सल्ल्याचा काही एक परिणाम झाला नाही. त्याने त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले व तो त्याच अरण्यमार्गे पुढे निघाला. वाटेत एका जागी त्याला ताडामाडाएवढा उंच व अवाढव्य देहधारी रोमांच राक्षस भेटला.



तो राक्षस दिसायला भयंकरच होता. त्याचे डोके हत्तीसारखे मोठे होते. त्याला आग पाखडणारे डोळे होते आणि हत्तीच्या सारखेच दोन मोठे सुळे देखील होते. शिवाय सर्व अंगावर अस्वलासारखे लांब लांब केसही होते.

रोमांच राक्षस पंचायुधाच्या वाटेवर आडवा उभा राहून हुंकारला - ‘‘कोण रे तू? कोठे निघालास? उभा रहा! या जंगलात पाऊल टाकायला तुझी छाती कशी झाली? माझे नाव ऐकूनच लोक थरथर कापतात. मी तुला आता गिळतो!’’






पंचायुध जरासुद्धा न भिता म्हणाला - ‘‘राक्षस राजा, मी सर्व कळल्यावरच या वाटेने आलो आहे. खबरदार, तू जवळ आलास तर!’’ असे दरडावून पंचायुधने धनुष्यावर बाण चढवून नेम धरला व राक्षसावर सोडला.

तो बाण राक्षसाने अंगात घातलेल्या कातड्याला लागला, राक्षसाला लागलाच नाही. तेव्हां पंचायुधाने बाणामागून बाण सोडून रोमांचावर शरवृष्टीच केली. परंतु तो प्रयत्नही निष्फळ ठरला. शेवटी पंचायुधाने विषारी बाण सोडले.

परंतु त्यामुळे सुद्धा राक्षसाचे काहीही नुकसान झाले नाही.

आता मात्र राक्षस मोठ्याने हुंकारला व पंचायुधावर धावला. पंचायुधाने आपली तलवार उपसली व राक्षसावर वार केला. परंतु राक्षस जागचा हललासुद्धा नाही.




तेव्हा पंचायुध राक्षसाला म्हणाला - ‘‘तू आपल्या मूर्खपणाने मला ओळखलेले दिसत नाहीस. माझं नाव पंचायुध आहे, लक्षात असू दे. मी या अरण्यात पाऊल टाकतांना फक्त आपल्या आयुधांवरच अवलंबून राहून इकडे आलो नाही!’’ असे म्हणत पंचायुधने मूठ आवळून राक्षसाला एक ठोसा दिला. राक्षस जागचा हलला नाही.

राक्षस जोराने हंसला व म्हणाला - ‘‘पोरा! तुझे हे धाडस पाहून तू कोणी सामान्य माणूस असशीलसे मला वाटत नाही. माझ्यासारख्या प्रलयभयंकराशी युद्ध करायचे साहस तू दाखविलेस. इतर लोक मला नुसते पाहूनच बेशुद्ध होऊन पडतात. मग तुला माझी भीति न वाटण्याचे काय कारण रे?’’

‘‘भय वाटण्याचे कारणच कां असावे? जो जन्मतो त्याला मरण हे असतेच! शिवाय माझ्या अंगात वज्रायुधासारखं एक खड्ग आहे. ते खड्ग म्हणजे ज्ञान. तू मला गिळलेस, तर ते खड्ग तुला उभे चिरून काढील!’’

राक्षस एक दोन क्षणच विचार करीत राहिल्यावर म्हणाला - ‘‘पोरा, तू म्हणालास त्यांत काही अर्थ असावा असे मला वाटू लागले आहे! ते काही असो, एवढे खरे की तू निर्भय आहेस, आणि शूर पराक्रमीही आहेस. मी तुझ्यासारख्याला गिळायचं म्हटलं तरी कदाचित् पचवू शकणार नाही. आतां तू तुला जिकडे जावयाचे असेल तिकडे खुशाल जा.’’



पंचायुधरूप अवतार घेतलेल्या बोधिसत्वांनी रोमांच राक्षसाला आशीर्वाद दिला व म्हटले - ‘‘तू मला सोडलेस, ठीकच झालं. परंतु तुझं पुढे काय? तू कितीदा या जगात जन्म घेऊन कुकर्मे करीत निकृष्ट जीवन जगत राहिला आहेस, आणि अज्ञान अंधकारांत कोणास ठाऊक, किती काळ भटकत राहिला आहेस? तू आणखी कितीही दिवस नाहीं, तर युगानुयुगे जिवंत राहिलास, तरी तुला गती नाही का?’’

‘‘तर मग महात्मन्, या अज्ञानांधकारातून बाहेर निघायला काही मार्ग आहे का? असला तर कृपा करुन सांगा.’’ राक्षसाने विचारले.

‘‘तू या अरण्यांत राहून अरण्यमार्गाने येणार्‍या-जाणार्‍यांचा वध करुन त्यांना खातोस व अशा तर्‍हेने तू आपले पाप वाढवीत आहेस. तुझी पापकर्मे जितकी वाढत जातील, तुला तितकाच जास्त काळ हा निकृष्ट राक्षसजन्मच मिळणार, तुला मोक्ष लाभ मिळणेच शक्य नाही. तुला उत्तम मानवयोनीतच जन्म हवा असेल तर तू पापकृत्ये करण्याचे सोडून दे!’’ असा उपदेश करून बोधिसत्वांनी त्या राक्षसाला मानवांचे हित व्हावे, यासाठी त्याने पालन करण्यालायक व पुण्यप्राप्तीस आवश्यक असलेली पांच सूत्रे सांगितली, व अधम मानवत्व आणणारी पांच तंत्रे सांगितली.


त्या दिवसापासून रोमांच राक्षसाने आपली राक्षसी कृत्ये सोडली आणि तो त्या अरण्यमार्गे येणार्‍या लोकांचा अतिथि-सत्कार करू लागला आणि धर्मबुद्धी नावे प्रसिद्ध झाला.

अशा तर्‍हेने बोधिसत्वांच्या उपदेशामुळे भयंकर राक्षस देखील सन्मार्गाने चालू लागला.

उंदीर आणि चिचुंद्री

एका धान्याच्या कणगीस एक लहानसे भोक होते. त्यातून एक अशक्त व भुकेलेला उंदीर आंत शिरला आणि तेथे बरेच दिवस राहिला. यथेच्छ धान्य खाऊन तो इतका धष्टपुष्ट झाला की, त्यास त्या भोकातून बाहेर पडता येईना.

एक चिचुंद्री त्याची ती धडपड पाहात बसली होती, ती त्यास म्हणाली, ‘गडया, ह्या भोकातून बाहेर पडण्यास एकच युक्ति आहे. तू पहिल्याने आत शिरलास त्यावेळी जितका बारीक होतास, तितकाच बारीक तू पुनः होशील तेव्हाच तुला या भोकातून बाहेर पडता येईल.’



तात्पर्य:- अविचाराने किंवा अधाशीपणाने मनुष्य संकटांत पडतो.

Saturday 16 February 2013

राजा आणि कवी

राजा आणि कवी
    पृथ्वीराज चौहान हा दिल्लीच्या तख्ताचा शेवटचा हिंदू राजा. तो महापराक्रमी व कुशल धनुर्धर होता. चंद वरदायी हा त्याच्याच दरबारातील एक अतिशय प्रतिभावंत कवी होता. त्यानच 'पृथ्वीराज रासो' हे काव्यचरित्र लिहिले. शहाबुद्दीन घोरीने भारतावर सतरा वेळा आक्रमण केले. त्यापैकी सोळा वेळा पृथ्वीराजाने त्याचा पराभव केला. मात्र सतराव्या वेळी घोरीने पृथ्वीराजाचा पराभव केला. त्याला कैद करून त्याचे डोळेही काढले. चंद वरदायीला फार वाईट वाटले. तो पृथ्वीराजाला भेटण्यासाठी म्हणून शहाबुद्दीन घोरीकडे गेला. तेथे त्याने आपली काव्यप्रतिभा दाखवून घोरीवर चांगली छाप पाडली. घोरीशी बोलता-बोलता त्याने पृथ्वीराजाच्या शब्दवेधी बाणकौशल्याची माहिती दिली. शहाबुद्दीन घोरीलाही उत्सुकता लागून राहिली. त्याने पृथ्वीराजाच्या धनुर्विद्येची परीक्षा आपल्या दरबारात घेण्याचे ठरविले. दरबारात आपल्या आसनाखालीच 'आवाज' केला जाईल, अशी त्याने व्यवस्था केली. त्या आवाजाला लक्ष्य करून पृथ्वीराज बाण सोडणार होता. मात्र त्या आधी चंद कविरायने एक दोहा सादर केला. त्या दोहय़ामध्ये पृथ्वीराज चौहानला सूचित करणारा एक इशारा होता. पृथ्वीराजाला तो 'इशारा' कळायला वेळ लागला नाही. ठरल्याप्रमाणे लक्ष्यस्थानावर आवाज होताच पृथ्वीराजानं अचूक बाण मारला. तो नेमका शहाबुद्दीन घोरीच्या छातीत घुसून तो मरण पावला. त्यामुळे दरबारात एकच खळबळ उडाली. सैनिक त्या दोघांनाही पकडायला धावले; परंतु दोघांनाही शत्रूच्या तावडीत सापडायचे नव्हते. असं म्हणतात की, तत्क्षणीच पृथ्वीराज चौहान व चंद वरदायी यांनी परस्परांना ठार मारून आपली जीवनयात्रा संपविली. राजा आणि कवीने परस्परांवरील आपल्या मैत्रिप्रेमाची अशी परिपूर्ती केली होती.

‘अंधारात कसा चढणार डोंगर?’


तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने. रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला. इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला. 'राम राम पाव्हनं का असं निजलात?' म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता. शेतकरी म्हणाला, ''राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.'' म्हातारा हसला.... म्हणाला, ''अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?'' ''एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.'' तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ''अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.'' म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा!
वाट पाहात बसून कशाला राहायचं? जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असूद्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.

संकल्प करा : निमित्त सांगून, कारण काढून मी करायची गोष्ट पुढे ढकलणार नाही.

खरी नक्कल .

भोजराजाकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला.
त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.
भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखांन आला, तशाच तऱ्हेनं निघून जाऊ लागला.
दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही. त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून, आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला.
त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, ‘अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजर करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.’
बहुरुपी म्हणाला, ‘महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.’
बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याल तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या.

असा चालतो शेअर बाजार !!! :-

एकदा एका गावात एक माणुस आला. त्याने गावकर्‍यांना सांगितले की त्याला माकडे पकडायची आहेत. प्रत्येक माकडामागे तो गावकर्‍यांना दहा रुपये देईल.
गावकरी खुश झालेत व जवळच्या जंगलात जाउन माकडे पकडायला लागलेत.
माकडे पकडायला गावकर्‍यामधे स्पर्धाच लागली. प्रत्येक जण माकडे पकडायचा व तो माणुस त्यांना माकडामागे दहा रुपये द्यायचा.
काही दिवसांनी माकडे कमी सापडू लागली तेंव्हा त्या माणसाने गावकर्‍यांना सांगीतले तो आता माकडामागे वीस रुपये देईल. गावकर्‍यांनी बाजुच्या जंगलातुन माकडे आणली व माकडामागे वीस रुपये वसुल केलेत.
काही दिवसांनी त्याने माकडामागे तीस रुपये देतो असे सांगीतले व फार थोडे माकड खरेदी केलेत कारण गावकर्‍यांना माकडे सापडेनात.
आता माकडे पन्नास रुपयाला खरेदी करतो असे सांगून तो वाट बघू लागला. गावकरी त्याला माकडे देऊ शकले नाहीत तेंव्हा तो त्यांना म्हणाला ," मी काही दिवसांत जवळच्या शहरात जाऊन येतो तो पर्यंत माकड सापडल्यास त्याच्या मदतनिसाकडे जमा करावी व तो त्यांचे पैसे देईल.
माणुस शहरात गेल्यावर त्याचा मदतनिस गावकर्‍यांना म्हणाला तुम्हाला माकडे सापडत नसल्यास तो जमा झालेले माकड पस्तीस रुपयांना गावकर्‍यांना देईल व तो माणुस शहरांतुन परत आल्यावर तेच माकडा गावकरी त्याला पन्नास रुपयांना विकू शकतात म्हणजे त्यांना पंधरा रुपयांचा फायदा होईल.
गावकर्‍यांना योजना पटली व त्यांनी शक्य तिथुन पैसे गोळा करुन पस्तीस रुपयांना माकड खरेदी केले. सर्व माकड पस्तीस रूपयांना विकुन मदतनिस शहरात गेला. त्यानंतर गावकर्‍यांना तो माणुस दिसला नाही व त्याचा मदतनिसही. पण सर्व गावात फक्त माकड दिसु लागलेत.

मुलगी आणि मम्मी :)

मुलगी - हॅल्लो.... हॅल्लो...
मम्मी - हां हॅल्लो...
मुलगी - हॅल्लो, मम्मी मी बोलतेय.
मम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या ?
मुलगी - बसलाय.
मम्मी - कशाने गं ?
मुलगी - आईसक्रिम
मम्मी - मग काही घेतलस की नाही ?
मुलगी - घेतलं ना. दुसरं आईसक्रिम.. म्हटलं काट्यानेच काटा काढावा.
मम्मी - सुपीक आहेस हो, आज अचानक कसा काय फोन केलास ?
मुलगी - अग, 'करेन करेन' म्हणत होते. जमलच नाही. तसं आताच कळलय यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणून. तसा केला फोन.
मम्मी - खरच की काय ?
मुलगी - मग. हवं तेवढं बोलू. फुल्ल टॉकटाईम आहे.
मम्मी - बरं, तू कशी आहेस ?
मुलगी - कशी काय ? तशीच आहे. पाच फुट दोन इंच, रंग गोरा...
मम्मी - अग कशी म्हणजे ... मजेत आहेस ना ?
मुलगी - अगदी मजेत.
मम्मी - आणि जावयबापू काय म्हणताहेत ?
मुलगी - कुठे काय म्हणतोय तो ? घरात असला तर म्हणेल ना ?
मम्मी - देवा, तुझी सेकंड लेंग्वेज निदान मराठी घ्यायला हवी होती. कसे आहेत जावयबापू ? मजेत आहेत ना ?
मुलगी - काय माहीत. असेल कदाचित. त्याचा ना एक प्रोब्लेमच झालाय.
मम्मी - काय , काय झालं ?
मुलगी - कसं सांगू ? लाज वाटते बघ सांगायला.
मम्मी - अरे देवा, अस झालय तरी काय ?
मुलगी - अग त्याला ना...... ॅसिडीटी झालीय.
मम्मी - ॅसिडीटी ?
मुलगी - हो ना.... त्याला हा प्रोब्लेम छोटाच वाटतो पण मला किती मोठा प्रोब्लेम होतो म्हणून सांगू ?
मम्मी - तुला कसला प्रोब्लेम ?
मुलगी - अगं, हा कायम पोट धरून आणि मी नाक धरून.
मम्मी - पण अचानक ॅसिडीटी कशी काय झालीय ?
मुलगी - काही नाही . हा सगळा बाहेरख्यालीपणाचा परिणाम
मम्मी - अग, काय बोलतेस काय तू ?
मुलगी - खरं तेच सांगतेय.
मम्मी - इतक्या कॅज्युअली कसं काय बोलू शकतेस ?
मुलगी - आता जे आहे ते आहे. सांगायला लाज कसली ?
मम्मी - म्हणजे तुला त्याचा हा बाहेरख्यालीपणा चालतो ?
मुलगी - नाईलाज आहे माझा. मी तरी काय करू ? मला नाही जमत.. सकाळी सकाळी उठायला... डबा बनवायला..
मम्मी - आता हा डबा कुठे आला मध्येच ?
मुलगी - अग, मी जेवणाचा डबा बनवून देत नाही म्हणून तर तो...
मम्मी - तुला हे बोलवतं तरी कसं ? एवढ्याश्या कारणांमुळे तो दुसर्या बायकांकडे जातो आणि तू...
मुलगी - अग मीच सांगितल त्याला. जा म्हणून.
मम्मी - तू ?
मुलगी - घरगुती जेवण असतं त्या बायकांकडे. पण याला काही स्वतःची अक्कल आहे की नाही ? रोज रोज ती करी, बिरयाणी कशाला खायची ? असलं चमचमीत खाल्ल्यावर होणारच ना ॅसिडीटी.
मम्मी - तू काय बोलतेयस हेच मला कळत नाही.
मुलगी - अग, असं उठसुठ बाहेर खाल्ल तर मग दुसरं काय होणार ?
मम्मी - याला तू बाहेरख्यालीपणा म्हणतेस ?
मुलगी - असं काय करतेस ? तुझं मराठी एकदम विक झालय बघ. बाहेर खाण्याला हाच शब्द आहे मराठीत.
मम्मी - कळलं तुझ ज्ञान. एक काम कर, रोज त्याला दुध देत जा.
मुलगी - चल.... काहीतरीच काय ? दुध प्यायला तो काय कुक्कुलं बाळ आहे ?
मम्मी - अगं, माझ्या बाये, थंड दुध देत जा. त्याने ॅसिडीटी कमी होईल. अजून काही प्रोब्लेम नाही ना ?
मुलगी - नाही कसा ? हल्ली फारच आंबटशौकीन झालय तो.
मम्मी - अरे देवा, हे आता काय नवीन ?
मुलगी - हो ना. परवा कैर्या घेऊन आला, काल आवळे आणि आज लिंबू आणणार आहे म्हणे. लोणचं कर म्हणतो ? मला कुठे येतय ते ? आंबटशौकीन कुठचा !
मम्मी - माझ्याकडे पाठव.
मुलगी - त्याला ?
मम्मी - गधडे, कैर्या, आवळे माझ्याकडे पाठव. मी देईन लोणचं बनवून.
मुलगी - तुला कुठे येतं लोणचं बनवायला ? आपल्याकडे तर जेवणसुद्धा बाबाच बनवतात. लोणचं बनवायला शिकले की काय ते ?
मम्मी - बाबा ? अग तुझे बाबा जाऊन चार वर्षे झाली ? विसरलीस की काय ? तू मधूराच बोलतेयस ना ?
मुलगी - नाही. मी माधूरी.... अय्या, राँग नंबर लागला वाटतं. सॉरी हें... मधुराच्या मम्मी.. 

ऊन-सावली

त्या दिवशी बादशहा अकबर खूप चिंतित तसेच खूप रागावलेलाही दिसत होता. त्याची काळजी दूर करण्यासाठी बिरबल हळूच म्हणाला, ‘‘खाविंद, आपण असे काळजीग्रस्त, रागावलेले चांगले दिसत नाही. तसेच ते आपल्याला शोभतही नाही.’’

‘‘कधी चांगल्या मनःस्थितीत असावे, कधी नाही, कधी हंसावे, कधी हंसू नये, हे आम्हाला चांगले समजते. मी बादशहा आहे, हे विसरूं नकोस. मी मला वाटेल तेच करीन. तुझ्या सल्ल्याची मला अजिबात गरज नाही.’’ अकबर रागाने म्हणाला.

‘‘रागावल्यामुळे आपला चेहरा खूप विकृत व कुरूप दिसतो आहे. खूप विचित्रही दिसतो आहे, जहाँपन्हाँ!’’ बिरबल म्हणाला. त्यावर जास्त चिडून बादशहा म्हणाला, ‘‘काय म्हणालास? माझा चेहरा विकृत व कुरूप दिसतो आहे? माझ्यासमोरच माझी अवहेलना करण्याची तुझी ही हिम्मत?’’

‘‘मला असे म्हणायचे नव्हते, खाविंद!’’ असे म्हणून बिरबल आणखी कांही म्हणणार तोच अकबर म्हणाला, ‘‘तुला आणखी कांही बोलण्याची आता गरज नाही. माझ्यासमोरून चालता हो. पुन्हा कधीही तुझे हे तोंड मला दाखवू नकोस.’’

अकबराच्या हुकुमाप्रमाणे बिरबल कांही न बोलता तेथून निघून गेला. ‘‘थोडेसे जवळ केले तर डोक्यावर चढून बसतात.’’ असे पुटपुटत, चरफडत अकबर दिवसभर गप्पगप्पच होता. तो खूप रागात दिसत होता.

दुसर्‍या दिवशी अकबर दरबारांत आला तेव्हां बिरबलाशिवाय सर्व दरबारी उपस्थित होते. त्याचे रिकामे आसन पहाताच अकबर म्हणाला, ‘‘बिरबल कुठे आहे?’’

‘‘खाविंद, ते म्हणत होते कीं, आपण त्यांच्यावर खूप रागावला आहात. आपण त्यांना इथून निघून जाण्याची आज्ञा केली आहे. त्यामुळ  आपल्या आज्ञेवरून हे शहर सोडून जात असल्याचे ते म्हणाले.’’ एकजण म्हणाला.

तेव्हां अकबराला कालच्या वादविवादाची आठवण झाली. आता तो विचारांत पडला. काल तो खूप घुश्श्यांत होता, ही गोष्ट खरी होती. तसेच त्याने बिरबलाला निघून जाण्याविषयीही सांगितले होतेच. त्याक्षणी त्याला वाटले कीं, बिरबलाचा अवमान करून आपण फार मोठी चूक केली आहे. त्याच्याशी आपण इतक्या कठोरपणे वागायला नको होते. त्यामुळे तो दुखावला असेल आणि इथून निघून गेला असेल. त्याला एकदम बिरबलविषयी सहानुभूती वाटू लागली.

कधीकधी अकस्मात एखादी घटना घडून जाते. कालची घटना तशीच होती. कोणाला कांही न सांगता बिरबल निघून गेला होता. बरेच दिवस लोटले पण त्याच्याविषयी कांही कळले नाही. त्याच्याशिवाय दरबार सुनासुना वाटत होता. अकबराला अगदीच राहवेना म्हणून त्याने बिरबलाच्या शोधार्थ शिपायांना पाठवले. परंतु त्याचा कांही पत्ता लागला नाही. कांहीही झाले तरी अकबराला बिरबलाचा शोध घेऊन त्याला परत बोलवायचे होते.

एके दिवशी तो मंत्रिगणांना म्हणाला, ‘‘संपूर्ण राज्यात दवंडी पिटा कीं, कडकडीत उन्हांत जी व्यक्ती छत्री न घेता राजमार्गावरून चालत येईल, त्याला शंभर मोहरांचे बक्षिस देण्यात येईल.’’

‘‘जहापन्हां, हे तर अशक्य आहे. छत्रीशिवाय कडकडीत उन्हांतून चालणे कोणाला तरी शक्य होईल का?’’ एक वयस्कर मंत्री आश्चर्याने म्हणाला.

‘‘असे असले तरीही दवंडी द्या. त्यामुळे नुकसान नक्कीच होणार नाही’’ बादशहाने प्रत्युत्तर दिले.

मग मंत्र्यांना गप्प रहावे लागले. त्यांनी बादशहाच्या आज्ञेनुसार दवंडी दिली.

दवंडी ऐकून लोक त्यावर उलटसुलट मतप्रदर्शन करूं लागले. ते म्हणूं लागले, ‘‘राज्यकर्त्यांच्या इच्छा किती विचित्र असतात!’’

कुग्रमचा एक गरीब गांवकरी ही दवंडी ऐकल्यावर म्हणू लागला, ‘‘रणरणीत उन्हांत छत्रीशिवाय चालले तर शंभर मोहरा मिळणार, वा !’’ मनांतल्या मनांत हे घोकत तो घरी आला.

त्याने आत्तापर्यंत एखादी मोहोरही कधी पाहिली नव्हती. दवंडीप्रमाणे तो वागू शकला तर त्याची गरीबी दूर होईल, त्याच्या सर्व गरजा भागू शकतील. त्याने आपल्या पत्नीला ही गोष्ट सांगितली.

पत्नी म्हणाली, ‘‘नुकतेच आपल्या शेजारी राहायला आलेल्या वीरेंद्रांचा सल्ला घ्या. ते खूप हुषार वाटतात.’’

‘‘त्यांना हे समजले असेल तर ते स्वतःच जाऊन हे बक्षिस पटकावू शकतात. असो, तरीही तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना भेटतो’’ असे म्हणून तो गरीब माणूस वीरेंद्रला भेटला.
त्याचे बोलणे ऐकून स्मितहास्य करीत वीरेंद्र म्हणाला, ‘‘हे कांही फार कठीण नाही!’’

‘‘तुम्हाला माहिती आहे, हे कसे करता येईल ते? माहिती असेल तर मला सांगा ना.’’ गायावया करीत तो गरीब म्हणाला.

वीरेंद्रने सांगितले कीं, ‘‘डोक्यावर पलंग धरून चालत जा म्हणजे डोक्यावर छत्री नसली तरी पलंगाच्या सावली मुळे तुझे उन्हापासून संरक्षण होईल. आणि पलंगाची सावली प्रत्येक क्षणी तुझ्याबरोबर असेल.’’

‘‘वा ! तुम्ही किती चांगला उपाय सांगितलात ! मला हे अजिबात सुचले नसते. आत्ताच आगर्‍यासाठी निघतो आणि बादशहांना भेटतो. आता मलाच शंभर मोहरा मिळतील’’ तो गरीब आनंदून म्हणाला.

तो लगेच निघाला व आगर्‍याला येऊन पोचला. मग अकबराची भेट घेऊन त्याने सांगितले, ‘‘खाविंद, मी उन्हांतून चालतच आपल्याकडे आलो आहे, तेही छत्रीशिवाय! सावलीतून चालत उन्हापासून बचाव करून घेत आलो आहे.’’

‘‘सर्वजण म्हणत होते कीं, हे अशक्य आहे. पण तुला हे कसे शक्य झाले?’’ बादशहाने विचारले.

‘‘डोक्यावर पलंग धरून चालत आलो आहे’’ तो गरीब म्हणाला.

‘शाब्बास, तुला शंभर मोहरा नक्की मिळतील. पण एक सांग ही कल्पना तुझी की आणखी कोणाची?’’ अकबराने विचारले.

‘‘नुकतीच आमच्या शेजारी आगर्‍याहून  वीरेंद्र नांवाची एक व्यक्ती रहायला आली आहे. ते खूपच हुशार आहेत. त्यांनी मला हा उपाय सांगितला’’ गरीब म्हणाला.

ती व्यक्ती म्हणजे बिरबल असणार, हे बादशहांनी ताडले. त्यांनी त्या गरीब माणसाला लगेचच शंभर मोहरा दिल्या आणि म्हणाले, ‘‘तुला सुखरूप घरी पोचविण्याकरीत माझे दोन शिपाई तुझ्याबरोबर येतील. ते दोघे परत येतील तेव्हां तुझ्या शेजार्‍यालाही त्यांच्याबरोबर पाठवून दे.’’

खूप आनंदलेला तो गरीब माणूस शिपायांसोबत गांवी परतला.

आठवड्याभराने वीरेंद्रला घेऊन शिपाई अकबराकडे आले. त्यावेळी वीरेंद्रने रूमालाने आपला चेहरा झाकून घेतला होता. अकबराने त्याला विचारले, ‘‘रूमालाने तू आपले तोंड का झाकून घेतले आहेस?’’

‘‘आपणच आज्ञा केली होती कीं, पुन्हा तोंड दाखवू नकोस. राजाज्ञेचे पालन करणे माझे कर्तव्य आहे’’ वीरेंद्र नम्रपणे म्हणाला.

‘‘बिरबल, आता मात्र मला तुझा चेहरा पाहायचा आहे’’ असे म्हणून अकबराने त्याच्या तोंडावरचा रूमाल बाजूला केला आणि हंसतमुखाने त्याला आलिंगन दिले.

श्रीमंत आणि गरीब - ज्याचा त्याचा दृष्टीकोन

एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला।लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.
एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.
आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,
' कशी झाली ट्रिप ? '
' फारच छान डॅड '
' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '
' हो ' मुलगा म्हणाला.


' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलं
मुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''
आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.


आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.


आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.

राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.


आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्‍यांची सेवा करतात.


आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.


संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.


वडील स्तब्ध झाले.
मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.


पाहण्याचा दृष्टीकोन ही अजब गोष्ट आहे की नाही ?
आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना.


*** साथ,सोबत संगत... ***

***  साथ,सोबत संगत... ***
ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या
घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला
लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा
पोकळी असते.
तर, ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल
अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय
चिणला गेला आहे.त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं
कुतुहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षांपूर्वी हे घर नवीन
बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल
जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पोकळीत
हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली? जे जवळजवळ अशक्य होतं.
त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष थेवून बसला,
की ती आता कशी,काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की
तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या
खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हे पाहून तो माणूस अवाक
झाला,गहिवरला. कल्पना करा १ नाही, २ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल
आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते,अजिबात आशा सोडून न देता !
एक पालीसारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन न जाता त्याची
अशा प्रकारे काळजी घेतो,तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू
शकतो.

तेंव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी
आधार द्या-जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते,तेंव्हा. "तुम्ही" म्हणजे
त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता.कोणतीही गोष्ट (नातं,
विश्वास...) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं, परंतु
जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं

जहाल मुंगीची गोष्ट

मुंगी मुंबईहून पुण्याला आली. पुण्यातील हायफाय ठिकाणी असलेल्या एका
कंपनीत तिने आपले काम सुरु केले. मुंगी रोज प्रामाणिकपणे कामावर यायची
आणि आपल काम करत राहायची. 

त्या कंपनीचा मालक एक सिंह होता. सिंहाला असे
वाटले की आपले काम वेगाने व्हावे यासाठी आणखीन एकाला कामावर ठेवावे.
मुंगी करते त्याच कामातील थोड काम दुसऱ्या कोणी केल तर काम आणखीन लवकर
होईल या उद्येशाने त्याने एका झुरळाला कामावर ठेवले. 
झुरळ मुंगीपेक्षा
वयाने जास्त असल्याने मुंगी त्याला 'सर्' म्हणू लागली. झुरळ कंपनीत
आल्यापासून आपल्या दिलेल्या कामापेक्षा सिंहाची दाढी कुरवाळण्यात जास्त
वेळ घालवायचे. आणि सिंहाला देखील ते आवडायचे त्यामुळे सिंह कधीच काही
म्हणत नसायचा. मग झुरळ जणू आपणच कंपनीचे मालक आहोत अस वागायला लागल.
सारखं सारखं मुंगीच्या मागे लागायचं. आणि काम संपल्यावर ते काम मी केल अस
सिंहाला सांगायचं. सिंह मग, शाबासकीची थाप त्या झुरळाला द्यायचं.
ते पाहून मुंगी आपली बिचारी खूप दुखी व्हायची. मुंगीला काम करून देखील मग
सिंहाचे बोलणे खावे लागायचे. झुरळाच्या ह्या वागण्याने कंपनीतील इतरही
'झुरळ सर्' म्हणायला लागले. मुंगीच्या डोक्यात मग कंपनी सोडायचा विचार
बळावू लागला. आणि जवळपास दीड वर्षानंतर त्याला आहे त्या कंपनीपेक्षा खूप
मोठ्या कंपनीत जाण्याची संधी मिळाली. 
नवीन कंपनीत आल्यावर मुंगी खूप खुश
झाली. कारण आता झुरळाचा त्रास तिला पुन्हा होणार नव्हता. नवीन कंपनी
डायनासोरप्रमाणे अवाढव्य होती. आणि हजारो मुंग्या, उंदीर, खेकडे, माश्या,
हत्ती, जिराफ, घोडे, हरणे, ढेकणे कामाला असलेल पाहून मुंगी अजूनच खुश
झाली.
नवीन कंपनीत मुंगीवर लक्ष ठेवायची जबाबदारी एका खेकड्याची होती. 

दोन
मोठ्या ढेकणांच्या हाताखाली काम करायचं अस मुंगीला सांगण्यात आल. पण दोन
आठवडे मुंगीला त्या कंपनीत नुसतंच बसून ठेवलं. नंतर मुंगीला कामाची
हत्यारे न देता काम कर अस सांगण्यात आल.
काम एका हरिणीचे होते. आणि त्या
कामातील प्रत्येक गोष्टीची परवानगी देण्याची जबाबदारी उंदीरमामाकडे होती. 

रोज झालेल्या कामाचा इमेल उंदीरमामाला पाठव अशी ताकीद दिली होती. हत्यारे
नसतांना देखील मुंगीने आपले काम सुरु केले. पण हत्यारानिशी लवकर होणारे
काम हत्यारविना मुंगीला जड जावू लागले. कामाला होणारा विलंब हत्यारामुळे
नसून मुंगीमुळे होतो असा निष्कर्ष उंदीरमामा आणि हरिणीने काढला. हत्यारे
पुरवण्याची जबाबदारी खेकड्याची होती. हत्यारे नाहीत ही माहिती त्याने
हरिणीला दिलेली नव्हती. चूक लपवण्यासाठी मग खेकडा कोणतेही कारण काढून
मुंगीला त्रास द्यायला लागला.
सुरवातीला मुंगीचा 'इमेल' नंतर तिची 'इंग्लिश' असे कोणतेही कारण काढून
त्रास दिला जायचा. मुंगी आपली न झालेली चूक देखील मान्य करायची. आणि
सारखी दुखी देखील राहायची. त्यामुळे तिच्यात 'न्यूनगंड' निर्माण झाला.
झालेल्या कामाचे इमेल पाठवण. आलेल्या इमेलचा रिप्लाय देण्. छोट्याशा 

कामासाठी उंदराची परवानगी आणि त्यासाठी सतत इमेल, फोन करून मुंगी आणखीनच
वैतागली. उंदीरमामा परवानगी देतो म्हणायचा. 
पण देत नसायचा. कामापेक्षा
इमेल आणि फोन जास्त होत असल्याने कामावर त्याचा परिणाम जाणवू लागला. आणि
सतत मीटिंग मधून कामाबद्दल मुंगीला ढेकणे रागवायचे. शेवटी मग मुंगीने
देखील ठरवलं की जशास तसे प्रत्युतर द्यायचे. 

मग कामात होणाऱ्या उशिराबद्दल मीटिंग बोलावली गेली. ज्या हरिणीचे ते काम
होते. त्या कामाचा लक्ष देणारा उंदीरमामा, एक मांजर, खेकडा, ढेकणे आणि
मुंगी असे जवळपास पाच सहा लोकांची मीटिंग बोलावली. मिटींगच्या
सुरवातीपासून सगळेच कामात उशीर होण्याबद्दल मुंगीलाच दोषी ठरवू लागले. पण
मुंगीने चूक नसतांना माफी मागायला नकार दिला. 
आणि मुंगी पेटली. बोलायला
सुरवात केल्यावर तिने परवानगीसाठी केलेल्या विलंबाला, हत्यारे न
पुरवल्याबद्दल उंदीरमामा आणि खेकड्याची सोलायला सुरवात केली.
ढेकणाचा
देखील समाचार घेतला. आणि आश्चर्य लहान मुंगी समोर उंदीर आणि खेकड्याने
मान टाकली. मुंगीला 'हल्याच्या उत्तरासाठी प्रतिहल्ला' हे सूत्र ध्यानी
आले. तेव्हापासून मुंगीची जहाल मुंगी झाली. 

आणि त्यानंतर असा त्रास तिला
पुन्हा झाला नाही.
 

बिरबल व राजाचा पानवाला

अकबर बादशहाला रोज विडा खाल्ल्याशिवाय चैन पडत नसे. विशेषतः शौकतअलीने तयार केलेले पान त्याला खूपच आवडायचे. तो नेहमी शौकतअलीचे या गोष्टीसाठी कौतुक करी. त्यावेळीं जाड्या शौकतअली बादशहाला अगदी वांकून सलाम करीत असे. 

तो म्हणाचा, ‘‘मी या कलेत पारंगत झालो, कारण माझ्या वडिलांनी ही विद्या मला शिकवली. वयाच्या आठव्या वर्षापासून मी पान लावतो आहे. ते आपल्या पसंतीला उतरते, हे माझे परमभाग्य आहे. माझ्या अंगांगात ही कला भिनली आहे. आणि आपल्याकडून तिचे कौतुक झाल्याने मी धन्य झालो आहे.’’

बादशहा अकबर कुठेही जाताना शौकतअलीला आपल्याबरोबर घेऊन जायचे. जेवणानंतर ते हमखास पान खात असत. अशीच तीन वर्षे गेली.

एके दिवशी शौकतअलीच्या हातून पानांत चुना थोडा जास्त पडला. बादशहाने ते पान खाल्ल्यावर त्याची जीभ भाजली. 
त्यामुळे पान थुंकून देत तो म्हणाला, ‘‘तुझे पान खाल्ल्याने माझी जीभ भाजली. विडा करण्यात माझा हात कोणीही धरू शकणार नाही, असे म्हणत असतोस. त्यावेळी तुला लाज वाटली नाही?’’

शौकतअली भीतीने थरथर कांपू लागला.

आपली भाजलेली जीभ सारखी बघत बादशहा म्हणाला, ‘‘शौकतअली, आत्ताच्या आत्ता जाऊन तुझी पिशवी भरून चुना आण. समजलं?’’

या अपराधासाठी बादशहा आपल्याला तुरूंगात टाकतील कीं आपला शिरच्छेद करतील, असा विचार करीत शौकत दुकानांत गेला.

पिशवी चुन्याने भरल्यानंतर दुकानदाराने विचारले, ‘‘एवढा चुना कां नेतोस?’’

‘‘मलाही माहित नाही. बादशहाने मागवला आहे.’’ नेमका त्याच वेळी महेशदास तिथे आला. त्याने विचारले, ‘‘बादशहांनी इतका चुना कां मागवला आहे?’’
पिशवी चुन्याने भरल्यानंतर दुकानदाराने विचारले, ‘‘एवढा चुना कां नेतोस?’’

‘‘मलाही माहित नाही. बादशहाने मागवला आहे.’’ नेमका त्याच वेळी महेशदास तिथे आला. त्याने विचारले, ‘‘बादशहांनी इतका चुना कां मागवला आहे?’’

‘‘बादशहांनी अशी आज्ञा कां केली, ते मलाही समजत नाही’’ शौकतअली दीनवाण्या स्वरांत म्हणाला.

‘‘बादशहांनी यापूर्वीं कधी अशी आज्ञा केली होती कां?’’ महेशदासने विचारले.

शौकतअली म्हणाला, ‘‘कधीच नाही.’’

‘‘मग एक काम कर. भरपेट तूप पिऊन जा.’’ महेशने उपाय सांगितला.

‘‘आधीच मी जाड्य़ा, त्यांत माझे पोट सुटलेले आहे. तूप पिऊन जायला सांगून माझी खिल्ली उडवता कीं काय?’’ शौकतने विचारले.
‘‘मी तुझी खिल्ली उडवत नाही. तुझ्या चांगल्यासाठी सांगतो आहे. बादशहांच्या समोर जाण्यापूर्वी पोटभर तूप अवश्य पी. असे केल्यानेच तुझा प्राण वाचेल. मला आता लवकर निघायला हवे’’ असे म्हणून महेशदास तेथून निघाला.

शौकतअली विचारांत पडला. चुन्याची पिशवी घेऊन घरी आला आणि बायकोकडून तूप मागवले. मग ते पोटभर प्यायला.

‘‘हे काय करताहात? असे बायकोने विचारले. तो कांही न बोलताच घाईने बाहेर पडला आणि बादशहांसमोर हजर झाला.

त्याच्याकडे न पहाताच ‘‘आलास?’’ असे म्हणून बादशहाने एका दरबार्‍याला सांगितले, ‘‘याला बाहेर घेऊन जा व तो चुना खायला घाल.’’
‘जहापन्हां, सगळा चुना खाल्ला तर मी मरेन. चुना पोट जाळतो’’ असे म्हणून शौकत रडू लागला.

‘‘हीच तुझी शिक्षा आहे’’ अकबर बादशहा गंभीरपणे म्हणाला. दरबारी त्याला बाहेर घेऊन आला व त्याला चुना खाण्याची आज्ञा केली.

राजाज्ञेचे उल्लंघन कसे करणार? म्हणून दोन्ही मुठी भरून चुना त्याने खाल्ला. आणि तेवढा चुना खाऊनच तो बेशुद्ध पडला. इतक्यांत, बादशहा तेथे आले व शौकतला पाहून म्हणाले, ‘‘अजून हा जिवंत आहे?’’

महत्प्रयासाने अली उठला व म्हणाला, ‘‘तूप प्यायल्यामुळे वाचलो, खाविंद.’’

‘‘तूप कां प्यायलास?’’ बादशहाने विचारले.

‘‘मी चुना खरेदी करत असताना महेशदास नांवाचा एक तरुण तेथे आला व त्याने सल्ला दिला कीं, तूप पिऊन महाराजांसमोर जा. बरे झाले, मी त्याचे ऐकले’’ शौकत म्हणाला.
‘‘तो महेशदास कोठे आहे? लवकर जा आणि त्याला माझ्याकडे घेऊन ये’’ अकबराने हुकूम केला.

थोड्य़ाच वेळांत शौकतअली महेशदासला घेऊन तेथे आला. त्याला पहाताच बादशहा म्हणाला, ‘‘छान बिरबल, तर हे तुझे काम आहे. शौकतअलीला तूप प्यायला कां सांगितलेस?’’

‘‘शौकतअलीने तूप पिऊन येऊ नये, अशी कांही आपली आज्ञा नव्हती. खाविंद, माफ करा. आपण अलीला पिशवीभर चुना आणण्याची आज्ञा केलीत. तेव्हांच मला अंदाज आला कीं, आपण त्याला शिक्षा देण्यासाठीच ही आज्ञा केली आहे. म्हणूनच मी त्याला तूप पिऊन येण्याचा सल्ला दिला. नाहीतर तो लगेचच मरण पावला असता’’ बिरबल म्हणाला.
‘‘तो मेला असता तर तुझे काय बिघडले? जास्त चुना घालून याने माझ्या जिभेला चटका दिला. त्याला शिक्षा झालीच पाहिजे.’’ अकबर म्हणाला.

‘‘शौकतअलीच्या मृत्यूने माझे कांहीच बिघडले नसते. त्यामुळे आपलेच नुकसान झाले असते. गेली तीन वर्षे तो आपल्या सेवेत आहे. आपण मला कित्येक वेळा सांगितले आहे कीं, त्याने तयार केलेले पान उत्तम असते. अशी व्यक्ती मरण पावली तर सर्वोत्तम पानवाला कसा मिळेल? तो आपल्यावर अवलंबून आहे. माणसाच्या हातून सहज चूक घडूं शकते. अनवधानाने झालेली चूक माफ करणे, हेच आपल्यासारख्या बादशहालाच शोभते’’ बिरबल म्हणाला. शौकत अलीने वांकून पुन्हां मुजरा केला.

ते पाहून बादशहा म्हणाला, ‘‘वांकून जमिनीला डोके टेकवायला सांगितले असते, तर बरे झाले असते. तीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा ठरली असती.’’

नंतर क्षणार्धाने बादशहा अकबर हंसून अलीला म्हणाला, ‘‘ठीक आहे. जे झाले, ते झाले. ताबडतोब आम्हा दोघांसाठी उत्तम पान तयार करून दे.’’

जेव्हां मूर्ख प्रश्न विचारतात

 यश हे नेहमी यशस्वी माणसाला उल्हसित करते. त्यामुळे त्याच्याकडे जे मित्र व सहकारी येतात, त्यांपैकी कांहीजण निर्भेळ आनंद वाटून घेतात, तर उरलेले मनांतल्या मनांत द्वेष करतात. हे अगदी बिरबलच्या काळांत सुद्धा होते.
जेव्हां तेव्हां बादशहाकडून प्रशंसा, शाबासकी मिळे तेव्हां कांही मानकरी त्याचा मत्सर करीत. त्यांना वाटे की, बादशहापुढे त्याचा पाणउतारा केलाच पाहिजे!
ते सर्व एकत्र आले व त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधून लागले. शेवटी एका मोठ्या योजनेची तयारी झाली! ही योजना जर यशस्वी झाली, तर आपण त्याचा आनंद कसा उपभोगायचा याचा विचार ते करुं लागले.
दुसर्‍या दिवशी सैतानखान-त्याच्या साथीदारांसह दरबारांत आला. बिरबल तिथे उपस्थित होता. दिवसाचे काम संपल्यावर बादशहा निवांतपणे लोकांकडून नवीन कल्पना, युक्त्या, सूचना ऐकण्यास तयार झाला.
सैतानखान उभा राहिला, खाली वांकला व अनुमतीची वाट पाहूं लागला. ‘‘बोल’’, बादशहा म्हणाला.
‘‘शहेनशहा, आपल्या सर्वांना माहीत आहे की बिरबल फारच हुशार आहे. हे जरी खरी असले तरी त्याच्या बुद्धीशी मी कशी बरोबरी करू शकेन, ह्याचा विचार मी करतो आहे, आमच्यापैकी कोणीही कठीण व क्लिष्ट प्रश्न सोडवूं शकत नाहीत, हे मला मान्य आहे’’, सैतानखान बिरबलाकडे कौतुकाने पाहात म्हणाला.
 ‘‘शहेनशहा, बिरबल जर एवढा हुशार असेल तर त्याचे वडील त्याच्यापेक्षां कितीतरी पटीने हुशार असतील! शहेनशहा! आम्हाला बिरबलच्या वडिलांना भेटायची इच्छा आहे. जर तो त्यांना ह्या राजदरबारी घेऊन येईल तरच त्यांना आपल्याला भेटता येईल,’’ असे बोलून सैतानखान थांबला.
बिरबल जरा सांवरून बसला. कांहीतरी शिजत असल्याचे त्याला कळले. सैतानखान हुशार आहे.
पण ही हुशारी तो योग्य कामासाठी कधीच वापरत नाही. त्याच्या मनाचा कल नेहमीच नकारार्थी असतो. बिरबलाने विचार केला, व त्याला एक गोष्ट दिसली. ‘त्याला माहित आहे की माझे वडील कांही खूप शिकलेले नाहीत. प्रामाणिक व सरळ मार्गावरुन चालणारे गृहस्थ आहेत. दरबारी व साशंक लोकांसमोर ते अनभिज्ञ आहेत. त्यांना ह्या लोकांपुढे व बादशहासमोर आणून उघडे पाडायचे व त्याबरोबर मलाही खाली पाडायचे आहे. मूर्ख! त्याला माहित नाही की कुठल्याही क्षणी मी एखादी गोष्ट त्याच्यावर सहज उलटवूं शकतो!’’
‘‘बिरबल’’, बादशहाच्या आवाजाने बिरबलच्या मनांतील विचारचक्रे जरा थांबली. ‘‘आम्हाला तुझ्या वडिलांना भेटायचे आहे.’’
‘‘हो, शहेनशहा!’’
‘‘रथ घेऊन तुमच्या गांवी जा. आणि वडिलांना घेऊन परवाच्या दिवशी दरबारांत उपस्थित रहा,’’ बादशहा म्हणाला.
‘‘शहेनशाह, जशी तुमची इच्छा! मी आत्ताच निघूं शकतो कां?’’
‘‘हो, वेळ कशाला वांया घालवतोस?’’ बादशहा म्हणाला.
शाही रथ गांवाकडे पळू लागला. बिरबलच्या पूर्वजांनी बांधलेल्या घरासमोर सारथ्याने रथ थांबवला. बिरबल पळतच वडिलांकडे गेला. ‘‘आप्पाजी.’’ असे म्हणून त्याने वडिलांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. ‘‘अरे वा! तुला बघून मला खूप आनंद झाला. तू कसा आहेस? सर्व ठीक आहे ना?’’ असे म्हणून त्या म्हातार्‍या गृहस्थाने बिरबलला जवळ घेतले व घट्ट मिठी मारली.
दोघांनी बर्‍याच गोष्टींवर खूप चर्चा केली. त्या रात्री जेवण झाल्यानंतर बिरबलने आपल्या वडिलांना राजदरबारांत घेऊन जाण्याविषयी सांगितले.
‘‘मी? पण मला माहित नाहीत राजदरबारातील चालीरीती,’’ जरा साशंक होऊन ते म्हणाले.
‘‘आप्पाजी, मी तुम्हाला शिकवतो. जेव्हां तुम्ही दरबारांत याल, तेव्हां खाली वाकून आपले कपाळ जमिनीला लावायचे. मान कायम ताठ ठेवा. जर, तुम्हारा तुमचे नांव, राहाता कुठे, विचारले किंवा तुम्ही जगण्यासाठी उदरनिर्वाह काय करता, असे विचारले तर अगदी संक्षिप्त उत्तर द्यायचे. दुसर्‍या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचे नाही. फक्त मान हलवायची किंवा हंसायचे. पण एक शब्दही उच्चारायचा नाही.’’
‘‘मौनम् सवार्थसाधनम्,’’ वृद्ध माणसाने संस्कृत श्लोक सांगितला, अर्थात- शांतता हे सर्वांचे सार आहे.
‘‘आणि हो आप्पाजी, अजून एक म्हणजे जेव्हां सर्व संपेल आणि त्यांनी तुम्हाला विचारले की तुम्ही ह्याला उत्तरे कां दिली नाहीत, तेव्हा सांगा...’’, बिरबल वृद्ध वडिलांच्याजवळ जाऊन त्यांच्या कानांत कांहीतरी कुजबुजला.
ते ऐकून ते जोरजोरात हंसत सुटले. बिरबल राजदरबारांत त्याच्या वडिलांबरोबर आला. बिरबलाने खाली वाकून जमिनीला आपले कपाळ टेकविले. तो उभा राहिला व स्वतःच्या जागेवर जाऊन बसला. त्या वयस्क माणसाने तसेच केले.
‘‘आदरणीय महोदय, आपले स्वागत आहे, आपण आसनस्थ व्हावे,’’ बादशहा हंसून म्हणाला. ‘‘शहेनशहा!’’ असे म्हणून म्हातारा गृहस्थ आदरपूर्वक खाली वांकला व बिरबलाशेजारी जाऊन बसला. ‘‘तुम्हाला येथे बघून आम्हाला खूप आनंद झाला. माननीय महोदय! तुमचा मुलगा म्हणजे एक रत्न आहे. तो खूप हुशार आहे, कठीण प्रसंगातून तो चटकन मार्ग काढतो. तुम्हाला त्याचा अभिमान असायला हवा.’’
वृद्ध गृहस्थ हंसला, त्याने नम्रतेने मान हलवली पण तो एक शब्दही बोलला नाही.
‘‘शहेनशहा! आम्हालाही या पूजनीय गृहस्थांना भेटून तेवढाच आनंद झाला. हे गृहस्थ आम्हास पित्यासमान आहेत,’’ असे म्हणून वृद्ध गृहस्थाशी बोलण्याची अनुमती मिळवण्याकरता थांबला.
बादशहाने हाताने संमती दिली.
सैतानखान बिरबलाकडे मत्सराने कटाक्ष टाकूं लागला. त्याने स्वतःला जरा सांवरले व वृद्ध गृहस्थाच्याजवळ जाऊन त्याने खाली वांकून त्यांच्या पायांना हात लावून नमस्कार केला.
‘‘मुला, दीर्घायुषी हो,’’ असे म्हणून वृद्धाने त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला.
‘‘बाबाजी, तुमचा मुलगा अत्यंत हुशार आहे. आणि तुम्ही त्याचे वडील असल्यामुळे त्याच्या-पेक्षां तुम्ही कितीतरी पटीने हुशार असणार!’’ असे म्हणून सैतानखान क्षणभर थांबला. वृद्ध गृहस्थ हंसला व आपली मान त्याने एका विशिष्ट दिशेला धरली. ‘‘बाबाजी, तो लहानपणी अकाली प्रौढत्व आलेले मूल होते कां?’’ त्याने विचारले.
पुन्हां एकदा वृद्ध हंसला व त्याने आपली मान दुसरीकडे फिरवली.
‘‘तो एक निष्ठावान मुलगा होता कां? तो तुमची काळजी घ्यायचा कां?’’
सैतानखानाला पुन्हां एकदा वृद्ध गृहस्थाने हास्याने ने उत्तर दिले.
‘‘तुम्हाला आमच्या बादशहाबद्दल काय वाटते?’’ असे म्हणून तो त्यांना अडचणींत आणण्याचा प्रयत्न करूं लागला.

वृद्ध गृहस्थ हंसला व शांत राहिला.
सैतानखानाने पुन्हां प्रश्न केला.
पुन्हां एकदा वृद्ध गृहस्थ मान फिरवून हंसला. पण त्याने एक सुद्धां शब्द तोंडातून काढला नाही.
बिरबल बादशहाकडे वळला आणि म्हणाला, ‘‘शहेनशहा! ते तुमचा खूप आदर करतात. त्यांना तुमचे अस्सल गुण माहित आहेत. पण ते कांहीही बोलणार नाहीत. ते अतिशय विनयशील आहेत. ते मुघल घराण्याचा आदर करतात! माझे वडील थोडे देवभोळे आहेत.! इतरांविषयी पटकन मत बनवीत नाहीत, जसे आपण देवाबद्दल मत बनवीत नाही, तसेच त्यामुळे ते एकही शब्द बोलत नाहीत.’’
‘‘मला माननीय महोदयांचा स्वभाव आवडला,’’ असे म्हणून बादशहाने स्मितहास्य केले.
सैतानखानाला कळून चुकले की त्या माणसाला अशिक्षित सिद्ध करण्याचा त्याचा उद्देश फसला आहे. त्याच्यामुळे इतर सहकार्‍यांना तो वृद्ध खरंच कसा आहे, हे जाणून घेण्याची संधी चालून आली. त्यांनी प्रयत्न केला. पण ते सुद्धां हारले. वृद्ध माणूस फक्त हंसायचा, मान हलवायचा, व नंतर एका विशिष्ट कोनांत ती रोखून धरायचा. पण एक शब्दही बोलायचा नाही.

‘‘शहेनशहा!’’ सैतानखान उठून उभा राहिला.

‘‘बोल, सैतानखान,’’ असे म्हणून बादशहाने बोलायला संमती दिली.

‘‘शहेनशहा, मला शंका येते की ह्या वृद्धाला कांही येते की नाही? हा माणूस शांत राहून त्याचे अडाणीपण लपवून ठेवतो आहे.’’
हे ऐकून सर्व दरबाराला धक्का बसला. बादशहा ओरडला,’’ ‘‘सैतानखान, ह्या गृहस्थाबद्दल तू अनादराने असा कसा बोलूं शकतोस?’’

त्यानंतर बादशहाने वृद्ध माणसाला मान उंचावताना, व बोलण्याची परवानगी मागताना बघितले.

‘‘बोला महोदय.’’

‘‘शहेनशहा! मला नम्रपणे सांगायचे आहे की, शांतता हेच मूर्खांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर आहे.’’ वृद्ध माणसाच्या शब्दांना सळसळत्या पात्यासारखी धार होती.
‘‘महोदय, फक्त हुशार माणसांनाच शांततेची ताकद माहिती असते,’’ बादशहा म्हणाला आणि बिरबल कडे वळला.’’ लायक वडिलांचा लायक सुपुत्र.’’ सैतानखानला कळून चुकले की तो खेळ हरला आहे. त्याच्या सहकार्‍यांना तर त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे असेच वाटत होते.

जेव्हां बादशहाने सोन्याचे कडे हातांतून काढून त्या वृद्ध गृहस्थाला भेट दिले, तेव्हा सैतानखानाचा राग पराकोटीला गेला होता. वृद्ध माणूस नम्रपणे खाली वाकला व आपले कपाळ जमिनीला टेकवून नंतर उभा राहिला.
‘‘शहेनशहा!’’ बिरबल म्हणाला, ‘‘माझे वडील वृद्ध आहेत. त्यांना विश्रांतीची गरज आहे. मला त्यांना घेऊन जाण्याची परवानगी मिळेल का?’’
‘‘हो, बिरबल, त्यांची काळजी घे. ते खरेच खूप हुशार आहेत. त्यांना शांततेची ताकद माहित आहे.’’ असे म्हणून बादशहा बराच वेळ हंसत राहिला