Saturday 16 February 2013

राजा आणि कवी

राजा आणि कवी
    पृथ्वीराज चौहान हा दिल्लीच्या तख्ताचा शेवटचा हिंदू राजा. तो महापराक्रमी व कुशल धनुर्धर होता. चंद वरदायी हा त्याच्याच दरबारातील एक अतिशय प्रतिभावंत कवी होता. त्यानच 'पृथ्वीराज रासो' हे काव्यचरित्र लिहिले. शहाबुद्दीन घोरीने भारतावर सतरा वेळा आक्रमण केले. त्यापैकी सोळा वेळा पृथ्वीराजाने त्याचा पराभव केला. मात्र सतराव्या वेळी घोरीने पृथ्वीराजाचा पराभव केला. त्याला कैद करून त्याचे डोळेही काढले. चंद वरदायीला फार वाईट वाटले. तो पृथ्वीराजाला भेटण्यासाठी म्हणून शहाबुद्दीन घोरीकडे गेला. तेथे त्याने आपली काव्यप्रतिभा दाखवून घोरीवर चांगली छाप पाडली. घोरीशी बोलता-बोलता त्याने पृथ्वीराजाच्या शब्दवेधी बाणकौशल्याची माहिती दिली. शहाबुद्दीन घोरीलाही उत्सुकता लागून राहिली. त्याने पृथ्वीराजाच्या धनुर्विद्येची परीक्षा आपल्या दरबारात घेण्याचे ठरविले. दरबारात आपल्या आसनाखालीच 'आवाज' केला जाईल, अशी त्याने व्यवस्था केली. त्या आवाजाला लक्ष्य करून पृथ्वीराज बाण सोडणार होता. मात्र त्या आधी चंद कविरायने एक दोहा सादर केला. त्या दोहय़ामध्ये पृथ्वीराज चौहानला सूचित करणारा एक इशारा होता. पृथ्वीराजाला तो 'इशारा' कळायला वेळ लागला नाही. ठरल्याप्रमाणे लक्ष्यस्थानावर आवाज होताच पृथ्वीराजानं अचूक बाण मारला. तो नेमका शहाबुद्दीन घोरीच्या छातीत घुसून तो मरण पावला. त्यामुळे दरबारात एकच खळबळ उडाली. सैनिक त्या दोघांनाही पकडायला धावले; परंतु दोघांनाही शत्रूच्या तावडीत सापडायचे नव्हते. असं म्हणतात की, तत्क्षणीच पृथ्वीराज चौहान व चंद वरदायी यांनी परस्परांना ठार मारून आपली जीवनयात्रा संपविली. राजा आणि कवीने परस्परांवरील आपल्या मैत्रिप्रेमाची अशी परिपूर्ती केली होती.

No comments:

Post a Comment