एक दिवस त्यांचे आईवडील शिकारीला गेले होते, आणि एक दुष्ट राक्षस त्यांच्या घरी त्यांची डुकरे चोरायला एक मोठा बांबूचा पिंजरा घेऊन आला. राक्षसाला ही दोन लहान मुले एकटीच घरांत खेळताना दिसली.
‘‘किती कोवळी छान आहेत! यांचं मांस तर फारच चविष्ट असेल.’’ राक्षसाच्या तोंडातली लाळ गळायला लागली. ‘‘पण या मुलांना पकडायचं तर शेजारी कुणाला कळता कामा नये.’’ त्याला एक कल्पना सुचली. ‘‘सगळ्या मुलांना केळी आवडतात.’’ त्याने एका केळीच्या झाडावरचा एक पिकलेला घड तोडला आणि आपल्या खांद्यावरच्या पिंजर्यांत ठेवला.
केळी पाहिल्याबरोबर निया धांवतच पिंजर्यांत शिरला. निमाला जरा धास्ती वाटत होती, पण ती रसरशीत केळी पाहून त्याला मोह आवरेना. तोही पिंजर्यांत शिरला. राक्षसाने ताबडतोब बाहेरुन दार बंद केले ‘‘पकडले रे मी तुम्हाला आता!’’ तो मनांत खूष झाला होता. पिंजरा घेऊन तो डोंगरापलीकडच्या गुहेत आपल्या घरी गेला. ‘‘मोठसं पातेलं घे आणि आता ती मोठी चूल पेटव.’’ त्याने मोठ्या आनंदाने बायकोला सांगितले. ‘‘आपल्याला आज मस्त जेवण मिळणार आहे.’’
या दोन मुलांना पाहून राक्षसीण इतकी खूष झाली की तिने हातातले काम टाकून प्रथम मोठे पातेले घेतले, त्यांत पाणी भरले आणि चूल पेटवली. नंतर राक्षसाने तो पिंजरा पातेल्यांत रिकामा केला.
निमा व नियाला पोहायला येत होते म्हणून ते त्या पाण्यांत तरंगत राहिले, ‘‘अग ए, पाणी तापलंय की नाही ते बघ बरं जरा!’’ राक्षसाने बायकोला सांगितलं. हे ऐकताच निमाला एक युक्ती सुचली. त्याने नियाला सांगितलं आणि दोघांनी पाण्यांत बुडी मारली. राक्षसीणबाईने जेव्हां पातेल्यांत पाहिलं तेव्हां तिला पाण्यावर बुडबुडे दिसले. खरं म्हणजे ती मुले पाण्यांत श्वास घेत होती.
‘‘राक्षस नि राक्षसीण इथे यायच्या आत आपण इथून पळून जाऊ या, निया’’ निमा ओरडला. त्या अरण्यात ते नदीच्या दिशेने पळायला लागले. तेवढ्यांत राक्षस जोडपे गुहेत परत आले. लुसलुशीत मटणाच्या कल्पनेने ती दोघे जिभल्या चाटत होती. पण भांड्यातून येणारे रडण्याचे आवाज ऐकून ते गोंधळले. त्यांनी भांड्यात वाकून पाहिलं तो काय, त्यांची स्वतःची मुलेच अर्धमेली होऊन त्या पाण्यांत गटांगळ्या खात होती.
किंचाळत राक्षसीणबाईने आपली बाळे त्या कोमट कढत पाण्यांतून बाहेर काढली. घाबरुन गेलेल्या त्या पोरांना तिने पोटाशी धरले. ‘‘बिचारी माझी मुलं! तुम्ही चांगलेच भाजले गेलात की रे! कळलं नसतं तर आम्ही तुम्हालाच खाऊन टाकलं असतं रे बाबांनो!’’ ती रडायला लागली. ‘‘हे त्या पोरांचंच काम आहे.’’ तिचा नवरा संतापाने फुणफुणत होता. ‘‘चल आता, आपण त्यांना पकडू या. आता तर त्यांना पकडून आपण खाल्लंच पाहिजे. त्यांनी जे केलंय त्याचा सूड घेतला पाहिजे आपण!’’
‘‘अग, मला झाडावर चढता येत नाही’’ दातओठ खात राक्षस म्हणाला. ‘‘मी या मुलांनाच विचारतो; त्यांनाच सांगतो मला शिकवायला. त्याची युक्ती त्यांच्याकडून काढून घ्यायला हवी.’’ त्याने मुलांना गोड आवाजांत हांक मारली, ‘‘अरे बाळांनो, तुम्ही किती हुशार, चुणचुणीत नि चलाख आहात रे! किती झटकन चढून गेलात इतक्या उंच झाडावर! कुणी शिकवलं ते तुम्हाला झाडावर चढायला?’’
‘‘आजोबा’’ नियाने उतावळेपणाने हांक मारली. पण निमाने त्याला सणसणीत चिमटा काढून गप्प बसायची खूण केली. ‘‘फारच छान हं!’’ राक्षस उद्गारला. ‘‘तुम्हाला झाडावर चढण्याबद्दल सगळी नीट माहिती आहे की नाही, त्याची परीक्षा घेऊ या हं! सांगा पाहूं, गुळगुळीत बुंध्याचे झाड असेल तर वर कसे चढायचे?’’ ‘‘मला माहिती आहे’’ वेडा निया लगेच सांगायला लागला, ‘‘झाडाच्या बुंध्यावर वेली उगवतात ना, त्या शोधून काढायच्या.’’
निमाने त्याला निमूट बसायला सांगितले पण आता उशीर झाला होता. गुपित उघड झाले होते. मुलांना खरोखरीच एक बळकट, जाजडजूड वेल मिळालेली होती आणि तिच्या साहाय्याने ते चटकन वर जाऊ शकले होते. राक्षसाने इकडेतिकडे पाहिले व ती वेल त्याला दिसली, ‘‘आ हा हा, आता मी आलोच तुमच्याजवळ!’’ तो खूष होऊन नंतर बायकोला हळूच म्हणाला, ‘‘मी आता झाडावर जाऊन त्या दोघांना खाली फेकतो. तयारीत राहा. कुर्हाडीने त्यांची डोकी उडवून टाक. यावेळेला त्यांनी आपल्या हातून निसटता कामा नये.’’ तिने होकार दिला आणि हातांतली कुर्हाड वर उंच धरुन ती अगदी तयार उभी राहिली. पण हुशार निमा काही स्वस्थ बसला नव्हता. त्याच्याजवळही छोटासा सुरा होताच. त्याने ती वेल वरुन हळूहळू कापायला सुरवात केली. वेलीच्या मदतीने तो अगडबंब राक्षस वरती चढत होता ना! राक्षस अर्ध्या उंचीवर धडपडत गेला असेल तितक्यांत वरुन वेल तुटली, आणि तो केकाटतच खाली कोसळला.
तो जेव्हां जमिनीवर आदळला तेव्हां त्याची बायको कुर्हाड उंच धरुन उभी होतीच. सांगितल्याप्रमाणे तिने त्याच्याच डोक्यावर कुर्हाडीचा घाव घातला. अरे बापरे! त्याच्या ओरडण्याने जमीन कांपायला लागली नि झाडे वादळांत असल्यासारखी हलायला लागली. आता राक्षस मंडळी ही काही सहजासहजी मरत नसतात, म्हणून तो जखमी झाला होता तरी मेला नाही.
‘‘निमा, आपण आता खलास होणार. आता मात्र नक्की मरणार!’’ निया रडायला लागला. पण निमा धाडसी होता. ‘‘छे, आपण नाही रे मरणार. देव चांगल्या माणसांना वाचवतो. आपण काही पाप केलेलं नाही. आपण या वृक्षदेवाची आणि या सरितादेवीची प्रार्थना करुं या. म्हणजे ते आपल्याला मदत करतील.’’
दोन्ही मुले मोठ्याने प्रार्थना म्हणायला लागली. राक्षसाच्या दर घावागणिक झाड लवत, हालत होते. पण त्यांची प्रार्थना देवाने ऐकली. कारण झाड पडले; पण पडले ते मुलांसकट नदीत पडले आणि प्रवाहाबरोबर भराभर पुढे वाहात गेले. राक्षसाला काही त्यांना उचलून घेता आले नाही. त्याच्या तावडीतून वाचून दोघेही सुखरूप घरी परत पोचले.
No comments:
Post a Comment